बोलणा-या निखा-यांची कविता : ग्लासनोस्त
डॉ. यशवंत मनोहर
कवी पद्माकर तामगाडगे यांच्या 'ग्लासनोस्त' या कवितासंग्रहातील कविता वाचकाला अनेक पातळ्यांवर अंतर्मुख करणा-या आहेत. भोवतीच्या समाजवास्तवाला अनंत भीषण प्रश्नांची आग लागली आहे. खूप लोक अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण या मुलभूत गरजांची परिपूर्ती होत नसल्याने अगतिक झालेले आहेत. यात शहरांमधील गरिबांचा जसा अंतर्भाव होतो तसा ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणावरील सर्वहारांचाही अंतर्भाव होतो. ही पिळवणूक मागील हजारो वर्षांपासून वंचितांच्या वाट्याला आलेली आहे. या पिळवणुकीला आज नवनवे आयाम प्राप्त होत आहेत आणि नवनव्या गनिमी तंत्राची जोडही तिला लाभत आहे. शोषणाची इतकी तरल शैली आज वापरली जाते की मेलेल्यांनाही त्यांच्या मरणाचा थांगपत्ता लागत नाही.
बहिष्कृतांच्या स्वाभिमानाची एक मूलगामी चळवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उभारली. त्या चळवळीमुळे भारतीय समाजाचे हजारो वर्षे लुळे पडलेले शरीर अपूर्व जिवंतपणाने मोहरून आले. मुक्यांना विद्रोही जिभा लाभल्या. १९५६ नंतर स्वाभिमानाचा एक नवा ज्वलंत आविष्कार या युगाने पाहिला. प्रत्यक्ष जीवनातल्या या स्वाभिमानावर प्रत्यक्ष माणुसकीही फिदा झाली. आणि त्याच्या वाड्.मयीन पराक्रमावर संपूर्ण जगानेच गौरवाची फुले उधळली. हा वाड्.मयीन पराक्रम १९५६ नंतरच्या मराठी साहित्याच्या रणभूमीवर प्रथम साकार झाला. ही रणभूमी अजून शांत झाली नाही. खूप प्रतिभांना आजही क्रांतीशी बोलता येते. खूप प्रतिभा आजही परिवर्तनाचा गौरव करीत आहेत आणि परिवर्तनाच्या मार्गावरील संकटांशी भांडतही आहेत. पद्माकर तामगाडगेंची प्रतिभा या प्रतिभांमधली एक महत्वाची प्रतिभा आहे. 'ग्लासनोस्त' या कवितासंग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने मी कवी पद्माकर तामगाडगे यांचे मनापासून अभिनंदन करतो.
पद्माकर तामगाडगे यांच्या कवितेत मला विशेषत्वाने जाणवली ती त्यांची जीवनदृष्टी ! ही जीवनदृष्टी धार्मिक नाही तर ती धर्मातीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ साली ही धर्मातीत जीवनशैली बुद्धानंतर पुन्हा प्रस्थापित केली. भारतीय संविधानातही तिचा सम्यक आशय आहे आणि माणसाचे संपूर्ण ऐहिक कल्याण हा तिचा विषय आहे. 'काही प्रश्न' या कवितेत कवीने निर्माण केलेल्या प्रश्नांमधून त्याची जीवनदृष्टी आपल्यापुढे पारदर्शक रूपात उभी राहते. याच कवितेच्या उत्तरार्धात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धर्मातीततेच्या बुलंद दीपस्तंभाकडे पाठ फिरवून गतकालीन सवयींचे ऐकत लोक धर्मांच्या दलदलीकडे निघालेले आहेत याचे दुःख उपरोधिक पद्धतीने व्यक्त केले आहे. हे अधःपतनशील स्थित्यंतर मागल्या ४०-५० वर्षातच स्पष्ट झालेले आहे. गुलामी लादणारांचा दुष्टपणा समजावून घेणे सोपे असते पण गुलामीवर प्रेम करणारांचा मूर्खपणा समजावून घेणे केव्हाही अवघडच असते. कोणीही गुलाम करीत नसतानाही स्वतःच गुलाम होणारी माणसे हा खुद्द स्वातंत्र्य, बंधुता आणि समता या मूल्यांनाही बिकट पेच वाटत असतो. अशा स्वयंसर्जित गुलामांची, अशा स्वतःसिद्ध लाचारांची संख्या आज वाढत आहे याची जिवंत यातना या कवितासंग्रहाच्या अंग प्रत्यंगातून वाहत आहे हे मला प्रकर्षाने जाणवले.
पद्माकर तामगाडगे हे नव्या पिढीचे शिलेदार कवी आहेत. या संपूर्ण पिढीला जाळत सुटलेल्या प्रश्नांशी कवी भांडतो आहे. हे भांडण त्यांच्या कवितेतील शब्दाशब्दातून पेटले आहे याचा अनुभव आपल्याला येतो. आजचे वास्तव कवीला गोंधळगर्दीसारखे वाटते. या गोंधळगर्दीचे उगम जाळून टाकायला हवेत हे प्रखरपणे कवीने इथे मांडलेले आहे. हे कार्य ज्यांच्या डोक्यात बुद्धिवाद सळसळतो आहे ते तरुण विचारांचे तरुणच करू शकतात असे कवीला वाटते. क्रांतीचे हिरवेकंच निखारे डोक्यात वागविणा-या तरुणांनी प्रतिक्रांतीच्या महासभेत शिरू नये असे 'हेच ते सत्य' या कवितेत कवीने सांगितले आहे.
या संपूर्ण कवितासंग्रहात आपल्या युगाला नवा आशय देण्याची, मानवी जीवनाला नवी जीवनशैली देण्याची आणि वैश्विक माणुसकीची नव्याने सर्जना करण्याची उत्कट तहान दाटलेली आहे.
या कवितासंग्रहात तडफडणारा आणखी एक प्रश्न आपले चित्त वेधून घेतो. तो प्रश्न आहे लोकांना अनुचित, अहितकारक आणि असभ्य गोष्टींबद्दल असलेल्या आसक्तीचा ! याला कारण आहेत सवयी. या सवयी भावनिक आहेत. त्याच त्या विचारांची विघातक ओझी वाहण्याच्या आहेत. परस्परांमधील दुरावे आणि दुष्टावे जपण्याच्या आहेत. माणसे या सवयींच्या पुरात वाहत आहेत. यांना वाहत ठेवणे ही पुराची इच्छा नाही पण वाहत राहणे ही उत्कट सदिच्छा माणसांचीच आहे. या सर्व आशयाचा आवाका
"भीमराया तुझ्या मताचा
जर देश घडविला असता
देशाचा कणकण इथला
हा प्रबुद्ध बनला असता."
या आटोपशीर चार चरणामध्ये कवीने मांडलेले आहे. त्यातून त्याच्या यातनांचे तळघर आपल्यापुढे उघडले जाते. सर्वत्र 'गोंधळ-गडबड' आहे. कोणी कोणाचे ऐकत नाही. ही वैचारिक अराजकाचीच मुजोरी होय असे म्हणता येईल. एकूणच समाजातील लोकांची मानसिकता अशी विलक्षण की लोक भूतकाळात तरी विसाव्याला जातात किंवा उद्याच्या स्वप्नात तरी तरंगत राहतात. या सर्व लपाछपीत लोकांचा वर्तमान काळच हरपून जातो. या सर्व प्रक्रियेत न जगण्याच्या प्रक्रियेलाच जगणे म्हणण्याची सवय माणसांना जडून जाते. आणि मग केवळच थोड्या लोकांची नव्हे तर एकूणच सर्व लोकांची शेती बंजर होऊन जाते. अनेक सुविधांमुळे अनेकांच्या रक्ताच्या पेशी पांढ-या होतात. माणसे पांढरपेशी होतात. मानवी उर्जाच मग वांझ होऊन जाते. या पांढरपेशांसोबतच कवीने सुखवस्तू नेतृत्वावर, लाचार मनांवर उपरोधाची धार धरली आहे. पण हे सर्व बदलावे हाच ध्यास कवीला लागलेला आहे. माणसाने मातीशीच नाते जोडावे. हे नाते समृद्ध करीत न्यावे. कोणत्याही चौकटीत मावणार नाही असे स्वतःचे निर्माण करावे. ही मानवाच्या अस्तित्वाची असीमता या कवितासंग्रहात मांडली गेली आहे. ती मला अत्यंत मोलाची वाटते. कवीला त्याच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून सदिच्छा !
डॉ. यशवंत मनोहर, नागपूर.
दि. २३-११-२०११
Comments
Post a Comment