Skip to main content

हिमालया माफ कर !

               हिमालया माफ कर !

हिमालया,
तू इतका मोठा ?
साऱ्या पर्वतांना लाजविणारा
इतिहासाची साक्ष ठेऊन;
कित्त्येक शतकं गाजविणारा.
तुझ्या हिमतीचीही द्यावी दाद.
जगाचा अनभिषिक्त सम्राट सूर्य
त्यालाही थोपवून धरलंस तू
आणि आजही हे अजिंक्यपद तुलाच?
हिमालया,
तू नाहीस नुसत्या माती-गोटयाचा
तू नाहीस केवळ उत्तुंग एकसंघ पाषाणाचा
तू नेसलेली हिमवस्त्र उगीचच नाहीत,
तू नाहीसच केवळ अचेतनाचा पुतळा,
तू आहेस सर्जनतेचा महामेरू,
तू प्रसविल्यास अनेक हिमनद्या,
तुझ्या आज्ञेने थोपवून धरले उद्दाम मेघ,
आणि तुझ्याच अंशातून जन्मल्या अनेक गंगा
तू शांतीचा विजिगीषू स्तूप आहे.
तू सहनशीलतेचा कळस आहे.
असंख्य तुफान, वादळवारे तुला थरकापले,
तरी तू तसाच अविचल आहेस.
हिमालया,
तू इतिहासाचा खरा साक्षी
तुझ्याच देखत म्लेंच्छ इथे आले
तुझ्या परोक्ष पानिपत घडले
तू पाहिलेस अनेक रणसंग्राम
तुझ्याच नजरेदेखत घडला इतिहास.
तू पाहिली आहेस देशाची फाळणी
जातीजातीत धर्माधर्माची महापातके
आणि इथेच विश्वशांतीचा प्रणेता ‘बुद्धदेखील’
हिमालया,
तू खरच खूप मोठा आहेस
कारण आजही तुझं अस्तित्व तसच आहे.
तुझं महत्पण शब्दात लपेटत नाही,
हे खरं आहे, हा इतिहास कधी लपत नाही
मात्र,
हिमालया माफ कर,
कारण तुझ्यावरही मात करून
तुलाच सर करणारा
द्विपाद माणूस होता
तुझ्याच शिखरावर जाऊन
जगाला चक्रावून सोडणारा
क्षणभर का होईना तुझ्यापेक्षाही
उंच होऊन तुलाच पराभूत करणारा
तुझं अद्वितीयपण इथेच संपवणारा,
माणूस. . .साधा माणूस. . .
आणि त्यातलाच शब्दातीत उत्तुंग नग
भारतभूमीच्या मूलनिवश्यांना,
नागवंशीय नागांना, दलित-पीडित, शोषितांना
जमिनीत घट्ट रुतलेल्या तुझ्या पायाप्रमाणे
पिढ्यानपिढ्या गाडून टाकलं होतं
त्या सर्व बहुजनांचा कैवारी
तुझ्यापेक्षा अगणित पटीने मोठा,
संविधानाचा महामेरू. . .
रंजल्या-गांजल्यांना नवजीवन देणारा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तू पाहिलास. . .
हिमालया,
तू खरंच खूप मोठा आहेस, शंकाच नाही,
मात्र मला क्षमा कर आणि तूच ठरव
जगाला मायेची सावली देणारा,
खरा हिमालय कोण?
तूच ठरव . . . तूच ठरव. . .  

-      पद्माकर तामगाडगे, मुंबई
··*··

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

महिला सक्षमीकरण सुरु आहे. . .

|| सृजनवेध || महिला सक्षमीकरण सुरु आहे. . . - डॉ. पद्माकर तामगाडगे महिला सक्षमीकरणाची प्रक्रिया केव्हा पासून सुरु झाली ? याचा विचार केल्यास. लगेच ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन आठवतो आणि त्याच बरोबर आठवतो त्या घटनेमागील इतिहास. क्लारा जेटकिन या रूसी महिलेने सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला अधिवेशनाचा प्रस्ताव ठेवला होता . दर वर्षी ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जावा. तिने जगातील सर्व महिलांना आवाहन केले आणि पुरुष आणि महिलांमध्ये कुठल्याही प्रकारची दरी निर्माण होऊ नये. जर पुरुष झगडा करीत असेल तर महिलांनी शांत राहून सामंजस्याने विचार करून, शांतपणे लढावे. आणि मग १९११ पासून १९१५ पर्यंत सातत्याने ८ मार्च हा महिला दिवस म्हणून जगभर साजरा केला गेला. महिलांना संगठीत करण्यासाठी सेंट पीटर्सबर्ग शहरात ‘राबोनित्सा’ पत्रिका काढली गेली. आणि इथूनच महिलांवरील होणारे अन्याय अत्याचार, असमानता यांच्या विरोधात एक सक्षम नेतृत्व उभारल्या गेले. पहिल्या महायुद्धातील कालावधीत ओस्लो(नार्वे) मधील महिलांनी युद्धाचा निषेध दर्शविला, रशियन क्रांतीची सुरुवात ८ मार्च १९१...

अचल चेतनागृह : राजगृह -डॉ. पद्माकर तामगाडगे

अचल चेतनागृह : “राजगृह” “Education is not preparation for life: education is life itself.” John Dewey डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचा आयुष्यपट पहिला तरी जगातील प्रत्येक माणूस दिपून जातो असा लख्ख जीवन प्रवास जगातील अपवादात्मक विभूतीचाच असेल! किंबहुना फक्त डॉ. बाबासाहेबांचाच असेल... आयुष्यातील एकेक घटना आणि त्या घटना-प्रसंगांना येणारे अवघड वळण, आयुष्याच्या पावलोपावली येणारा नित्य संघर्ष. अस्पृश्यतेच्या सावटाखाली जगतांना येणाऱ्या अपमानाची झळ सोसत सर्वोच्च स्थानी पोहोचण्याचे परम ध्येय. उजेड मागत फिरणाऱ्या कफल्लक पिढ्यांना त्यांच्या झोळ्या लख्ख प्रकाशाने भरून काळोखाला प्रकाशमान करणारा हा महासूर्य. एकाच आयुष्यात अलौकिक म्हणावे, जादुई म्हणावे असे कार्य या महामानवाच्या हयातीत त्यांनी केले आहे. त्यांच्या उत्तुंग कार्याचा, व्यक्तिमत्वाचा वेध शब्दात पकडता येईल असा शब्दच कोणत्या भाषेत उपलब्ध नाही. अशाच एका पैलूचा या निमित्ताने धांडोळा या लेखाच्या निमित्ताने घेणार आहोत. महामानव डॉ. बाबासाहेबांचे एकूण आयुष्य पहिले तर प्रत्येक गोष्टीसाठी धडपड आहे. कोणतीच गोष्ट त्यांना सहजासहजी प्राप्त झाली नाह...

. . . येणाऱ्या सळसळत्या भविष्या

. . . येणाऱ्या सळसळत्या भविष्या -डॉ. पद्माकर तामगाडगे, ९८६९५८१६४७           जगाने कूस बदलली तो काळ आपणास सांगता येतो. १९६० नंतर हे जागतिक स्थित्यंतर प्रकर्षाने सर्व स्तरात जाणवायला लागले. भारतातील सर्वसामान्य माणसांपासून ते नवकोट नारायणांपर्यंत सगळ्याच वर्गीय पातळ्यांना कमी-अधिक प्रमाणात या झाला जाणवायला लागल्या होत्या. त्या तीक्ष्ण होऊन आता असह्य व्हायला लागल्या आहेत. म्हणून लोकांची जगभरातील ओरड प्रत्येकाच्या कानापर्यंत ऐकायला येत आहे. १९६० नंतर औद्योगिक क्रांतीबरोबरच ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात विकास पाऊन सर्वसामान्यांच्या दारात उभे राहिले. जगात आर्थिक महासत्ता होण्याच्या स्पर्धेत प्रत्येकच देश सहभागी होऊ लागला आणि वरकरणी नकार दिसणारा देशही प्रत्येक देशाला स्पर्धकच समजायला लागला. खाऊजा धोरण आले म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण आणि सातासमुद्रापल्याडच्या सीमा क्षणात जवळ आल्या हे विश्व आता ग्लोबलकूस झाले. आंतरराष्ट्रीय व्यापार-उद्दीम, विविध करार झाले. एकमेकांसाह्य करू अवघे धरू सुपंथ म्हणत हातात हात घा...