Skip to main content

बाबासाहेब तुम्ही गेल्यापासून...

 बाबासाहेब तुम्ही गेल्यापासून...

बाबासाहेब तुम्ही गेल्यापासून...
आम्ही तिथेच आहोत... 
राजगृहाच्या पायरीवर...
ढळू दिला नाही कोपराही
आमंत्रणे भिरकावून बसलो
'हिंदू'  कॉलनीच्या गस्तीवर...

बाबासाहेब तुम्ही गेल्यापासून...
आम्ही तिथेच आहोत...
हिंदू कोड बिलाच्या पानावर...
शब्दही जीर्ण होऊ दिला नाही
सुधारणा त्यांनी केल्या असतील...
मात्र, पाठांतर आमच्या वस्तीवर

बाबासाहेब तुम्ही गेल्यापासून...
आम्ही तिथेच आहोत...
२६, अलीपुर रोडवर...
'आम्ही भारताचे लोक' होऊन
संविधानाचे रक्षक होऊन
अष्टोप्रहर संसदेच्या दारावर

बाबासाहेब तुम्ही गेल्यापासून...
आम्ही तिथेच आहोत...
लंडनच्या स्मृतीतील स्थळावर...
आमूलाग्र असेल बदलले जग
कवेलूही बदलू दिला नाही असा
दबदबा निर्माण केला जगावर

बाबासाहेब तुम्ही गेल्यापासून...
आम्ही तिथेच आहोत...
नागपूरच्या 'दीक्षाभूमीवर'...
बावीस प्रतिज्ञांचे धडे घेत
दरेकाने दरेकाला दीक्षा देत
लक्ष्य बौद्धमय भारतावर

बाबासाहेब तुम्ही गेल्यापासून...
आम्ही तिथेच आहोत...
आम्ही तिथेच आहोत...
आम्ही हललोच नाही...
१९५६ पासून...

- पद्माकर तामगाडगे

Comments

Popular posts from this blog

महिला सक्षमीकरण सुरु आहे. . .

|| सृजनवेध || महिला सक्षमीकरण सुरु आहे. . . - डॉ. पद्माकर तामगाडगे महिला सक्षमीकरणाची प्रक्रिया केव्हा पासून सुरु झाली ? याचा विचार केल्यास. लगेच ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन आठवतो आणि त्याच बरोबर आठवतो त्या घटनेमागील इतिहास. क्लारा जेटकिन या रूसी महिलेने सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला अधिवेशनाचा प्रस्ताव ठेवला होता . दर वर्षी ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जावा. तिने जगातील सर्व महिलांना आवाहन केले आणि पुरुष आणि महिलांमध्ये कुठल्याही प्रकारची दरी निर्माण होऊ नये. जर पुरुष झगडा करीत असेल तर महिलांनी शांत राहून सामंजस्याने विचार करून, शांतपणे लढावे. आणि मग १९११ पासून १९१५ पर्यंत सातत्याने ८ मार्च हा महिला दिवस म्हणून जगभर साजरा केला गेला. महिलांना संगठीत करण्यासाठी सेंट पीटर्सबर्ग शहरात ‘राबोनित्सा’ पत्रिका काढली गेली. आणि इथूनच महिलांवरील होणारे अन्याय अत्याचार, असमानता यांच्या विरोधात एक सक्षम नेतृत्व उभारल्या गेले. पहिल्या महायुद्धातील कालावधीत ओस्लो(नार्वे) मधील महिलांनी युद्धाचा निषेध दर्शविला, रशियन क्रांतीची सुरुवात ८ मार्च १९१...

अचल चेतनागृह : राजगृह -डॉ. पद्माकर तामगाडगे

अचल चेतनागृह : “राजगृह” “Education is not preparation for life: education is life itself.” John Dewey डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचा आयुष्यपट पहिला तरी जगातील प्रत्येक माणूस दिपून जातो असा लख्ख जीवन प्रवास जगातील अपवादात्मक विभूतीचाच असेल! किंबहुना फक्त डॉ. बाबासाहेबांचाच असेल... आयुष्यातील एकेक घटना आणि त्या घटना-प्रसंगांना येणारे अवघड वळण, आयुष्याच्या पावलोपावली येणारा नित्य संघर्ष. अस्पृश्यतेच्या सावटाखाली जगतांना येणाऱ्या अपमानाची झळ सोसत सर्वोच्च स्थानी पोहोचण्याचे परम ध्येय. उजेड मागत फिरणाऱ्या कफल्लक पिढ्यांना त्यांच्या झोळ्या लख्ख प्रकाशाने भरून काळोखाला प्रकाशमान करणारा हा महासूर्य. एकाच आयुष्यात अलौकिक म्हणावे, जादुई म्हणावे असे कार्य या महामानवाच्या हयातीत त्यांनी केले आहे. त्यांच्या उत्तुंग कार्याचा, व्यक्तिमत्वाचा वेध शब्दात पकडता येईल असा शब्दच कोणत्या भाषेत उपलब्ध नाही. अशाच एका पैलूचा या निमित्ताने धांडोळा या लेखाच्या निमित्ताने घेणार आहोत. महामानव डॉ. बाबासाहेबांचे एकूण आयुष्य पहिले तर प्रत्येक गोष्टीसाठी धडपड आहे. कोणतीच गोष्ट त्यांना सहजासहजी प्राप्त झाली नाह...

. . . येणाऱ्या सळसळत्या भविष्या

. . . येणाऱ्या सळसळत्या भविष्या -डॉ. पद्माकर तामगाडगे, ९८६९५८१६४७           जगाने कूस बदलली तो काळ आपणास सांगता येतो. १९६० नंतर हे जागतिक स्थित्यंतर प्रकर्षाने सर्व स्तरात जाणवायला लागले. भारतातील सर्वसामान्य माणसांपासून ते नवकोट नारायणांपर्यंत सगळ्याच वर्गीय पातळ्यांना कमी-अधिक प्रमाणात या झाला जाणवायला लागल्या होत्या. त्या तीक्ष्ण होऊन आता असह्य व्हायला लागल्या आहेत. म्हणून लोकांची जगभरातील ओरड प्रत्येकाच्या कानापर्यंत ऐकायला येत आहे. १९६० नंतर औद्योगिक क्रांतीबरोबरच ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात विकास पाऊन सर्वसामान्यांच्या दारात उभे राहिले. जगात आर्थिक महासत्ता होण्याच्या स्पर्धेत प्रत्येकच देश सहभागी होऊ लागला आणि वरकरणी नकार दिसणारा देशही प्रत्येक देशाला स्पर्धकच समजायला लागला. खाऊजा धोरण आले म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण आणि सातासमुद्रापल्याडच्या सीमा क्षणात जवळ आल्या हे विश्व आता ग्लोबलकूस झाले. आंतरराष्ट्रीय व्यापार-उद्दीम, विविध करार झाले. एकमेकांसाह्य करू अवघे धरू सुपंथ म्हणत हातात हात घा...