Skip to main content
"ग्लासनोस्त" कवी-पद्माकर तामगाडगे, प्रज्ञाप्रबोध प्रकाशन सांगली






                          
“ग्लासनोस्त” हुकुमत गाजवणारी कविता
                                                                               
                       -प्रा. सौ. सिंधू रामटेके






            'ग्लासनोस्त' या रशियन शब्दाला अगत्यपूर्वक पाचारण करून नव्या युगातील नव्या पिढीला नवीन जीवनदृष्टी देण्याकरिता आलेला पहिला-वाहिला बहार म्हणजे हा कविता संग्रह असून पुस्तकाची एकूण ८८ पाने झपाटलेली असल्याने एक पान वाचाल्ल्यानंतर मन ajun खाद्य मागते व पौष्टिक खाद्य पुरविले जाते. वीज चमकावी व डोळे दिपून जावेत असे हे दिपवणारे  साहित्य प्रतिभावंताच्या उर्जेची ती एक फार मोठी गुंतवणूक ठरेल.
            एकापेक्षा एक सरस अशा एकूण अठ्ठावन्न कवितांच्या बुलंद साम्राज्यात फिरून येताना सलामीची कविता सर्व कवितांचा मानबिंदू ठरते. प्रत्येक ओळ दखलपात्र व प्रभावी व्हावी याकरिता शब्दांना सौंदर्याच्या फ्रेममध्ये बसवतांना कवीने आपली कल्पनाशक्ती व प्रगल्भता पणाला लावतांना केवळ कल्पनेचे मनोरे बांधले नसून माणसांच्या उध्वस्तपणाचा हिशोब मांडला. साहित्य हा समाजाचा आरसा असतो. त्यांचे स्वच्छ प्रतिबिंब दिसण्याकरिता सुधारकी बाणा जपणारे कवी डॉ. पद्माकर तामगाडगे तरुणांना तेजस्वी होण्याकरिता समाज रक्षकाची  भूमिका बजावतात. व देश द्रोह्याचे मूळ नष्ट करण्याचे महद्कर्तव्य सांगतात हे कर्तव्य अधोरेखित करणा-या या खालील ओळी –
"जुन्याचे  जनुक जिवंत ठेवण्याच्या तकलादू धडपडी 
प्रतिक्रांती करण्याचे नाना मनसुबे, कट ओळखणे
हे माझे कर्तव्य आहे .
भर सभेत चार्वाक खाक केला, सोक्रेटीसचा  बळी घेतला, 
'कन्फ्युज  अँण्ड  रूल'चा नवा मंत्र आणलाय,
मला हा गोंधळ सावरला पाहिजे. "

            हे युग संगणकाचे या भूभागातील स्मार्ट पिढीचे पाय कवीला पाळण्यात दिसतात. ही पिढी तुमचे महाकाव्य, वेद, आदर्शवाद धुडकावेल व विचारेल- "बाप दाखव नाही तर श्राद्ध कर !" श्रद्धा व गावगुंडांच्या टोळ्यांना निरुत्तर करणारा हा प्रश्न तरुणांना पंगु करणा-या अवैज्ञानिक बाबींवर प्रकाश टाकीत भविष्याचा वेध घेते.
अविवेकी शक्तीची चाल व डावपेच ओळखण्याकरिता व आधुनिक पिढीचे वैचारिक पर्यावरण दुषित  होण्या आधीच त्यांना सावध केले पाहिजे. या दलदलीतून अलगद बाहेर काढणे हे या कवितांचे पायाभूत सत्य आहे.

"हे सळसळत्या रक्तातील पोलादी स्नायूच्या तारुण्य
इतिहासाच्या पानावरील धूळ वाढतच आहे,
क्षणभर मोहातून बाहेर पड,
व्यवस्था उगीचच बदलत नसते.
मूल्यांची जननी  परिवर्तनाच्या आवर्तनात आली की अग्नीचा ओहोळ
मस्तिष्क स्फोट घडवून पैदा करतात  'पॅन्थर्स' "


            आमच्या छळांच्या कहाण्यांनी इतिहासाची पाने रक्तरंजित झाली. आजही मुलाबाळांच्या वाट्याला तोच भोगवटा येतो सम्राटाचे रोजचे प्रत्येक पान याचा लिखित पुरावा आहे. आमचे विचार स्वातंत्र्य अडगळीत पडले. बिनचेह-याच्या व तत्त्वहीन  चळवळीमुळे संघटन शक्तीचा साक्षात मृत्यू झाला.  राजकीय वर्तुळात हाताची घडी तोंडावर बोट ठेवत वर्गाबाहेर उभे राहण्याची जाहीर शिक्षा मिळाली हे लोकसभेच्या व नुकत्याच झालेल्या महानगर पालिकेच्या निवडणुकांचे ज्वलंत उदाहरण आहे. स्वातंत्र्याने पसष्टावे पान उघडले तरी  साधे सकारात्मक सक्षम नेतृत्त्व मिळू नये याला जबाबदार कोण? नाईलाजाने सदैव होत असलेल्या अत्याचारालाच सदाचाराचा मेकअपलाऊन  जगताहेत खेड्यापाडयाचे आमचे बांधव खालीमान घालून व बघतात आई-बहिण निर्वस्त्र होतांना व झोकून देतात टाचेखाली चिरडण्याकरीता या करिताच  'सम' या कवितेतून पॅन्थर्सची डरकाळी झाली पाहिजे असे कवीला अपेक्षित आहे.
या कविता संग्रहाचे वैशिष्ट्ये म्हणजे भ्रामक कल्पनेला छेद दिलेला असून आपण त्या कोणत्या समुहाकरिता लिहिल्यात याचे सजग भान कवीने ठेवलेले आहे.

            'हिमालया मला माफ कर' या कवितेत भाषेचा अतिशय डौलदार वापर केला असून यामध्ये केलेली तुलना अतुलनीय आहे. हिमालय उंच असला, सर्जनतेचा महामेरू असला तरी जगाला मायेची सावली देणारा खरा महामेरू, बुद्धिमत्तेचा हिमालय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उंचीपर्यंत अजून कुणी पोहोचलेला नाही. 
 
            'ग्रंथदंगा', 'शाहीर', 'सातवारांचा पाऊस', 'दोषी', 'विठाबाई नारायणगावकर', 'आपण आपलं जगावं मर्जी सांभाळून' ह्या साचेबंद  विषयाच्या बाहेर पडून लिहिलेल्या कविता प्रखर सत्यावर प्रकाश टाकतात. वर्णाश्रमव्यवस्थेची शस्त्रक्रिया करतांना महात्मा फुले म्हणतात- 'फक्त याच देशात ब्रह्म बाळंत झाला व ब्राह्मण नावाची क्रांती जन्माला घातली.' त्यांच्या विकृतीतून 'मनू' नावाचं प्रॉडक्ट तयार झालं व हे बांडगुळ वर्णाश्रमाचा निर्माता झालं.
यांच्या गीतेला दरवेळी नवे चमत्कारिक अर्थ फुटले यांच्या अनेक काल्पनिक कथांनी विज्ञानवादी बुद्धही अवतारी केला. यांच्या प्रक्षिप्त विधानांची माय कोणत्या . . . रे?"

            याकरिता कवितासंग्रह खरोखरंच वाचनीय आहे. मनू नावाच्या यौगिक नागाने वेटोळे घातले असून तो केव्हा पालटेल कळणार देखील नाही त्याला पालटण्यापूर्वीच  निळ्या प्रकाशाचा उजेड देणारा कवीचा विचार म्हणजे काळाच्या महालाटेवर बसून दिलेली ही ललकारी होय.
 

"माणसाच्या कुबट पणाचा, कुजालेपानाचा वास सर्वत्र येतो.
बुद्धाच्या धम्म रसायनाने त्याला न्हाऊ घाल.
बेईमान भूमिगत मानुवृत्तीचा पुराण दंभेतिहास उकरून
प्रज्ञेच्या स्फटिकरुपी लेखणीने चितार."

            बौद्धधम्माच्या आचारसंहितेच्या तपशिलाला भेदून जाणा-या ओळी वाचताच हा जागल्या कवी कुठेतरी उंच उभा आहे जिथून सर्व आंबेडकरी समाज डोळ्याच्या कक्षेत आल्यानंतर काव्यनिर्मिती  स्फुरल्याचा हा ज्वलंत पुरावा आहे असे वाटत राहते.
 
            आंबेडकरी अभ्यासू साहित्यिक प्रथम स्वत:चे समीक्षण करतो कारण या संस्कृतीत माणूसकीनेच माणसाला छिन्नविछिन्न केले.  या अविस्मरणीय आठवणी आमच्या बापजाद्यांपासून चालत आलेल्या असल्याने कवीचे शब्द सुखासीन पंगतीला बसलेले नसून वेदनेचा हात धरून आलेले आहेत व म्हणूनच ही साहित्यकृती अस्सल असून 'बामणाघरी लिवण' हे तर आंबेडकरवाद्यांना संधी मिळताच क्षणाचाही विलंब न लावता खोडून काढला व त्याला 'ग्लासनोस्त'च्या रूपाने माणसांच्या असलेल्या या कवितांमुळे आणखी नवा आयाम प्राप्त झाला.
 
            प्रज्ञावंतांचे महामेरू डॉ. यशवंत मनोहर यांच्या प्रस्तावनेचा परीसस्पर्श  झाल्याने कवितांची उंची मोजणे अशक्य झाली असली तरी अशावेळी सुवर्ण महोत्सवी वर्षात डॉ. यशवंत मनोहरांचे समाजावर भाष्य करणारे ढळढळीत सत्य जसेच्या तसे आठवते १९५६ नंतर ट्रंकेत बंद केलेली मने आम्ही परत बाहेर काढली त्याला मोकाट सोडले आम्ही गंडेदोरे बंधू लागलो, आम्ही साईबाबाचे उपवास करू लागलो, आम्ही पंचशीलेला फसवलं, बावीस प्रतिज्ञेच्या हातावर तुरी दिल्या. या विषयाशी साम्य असलेली 'पांढरपेशी' ही कविता विशेष उल्लेखनीय आहे.

            दलदलीकडे प्रवास कारण-या लोकांकरिता आमच्या रक्ताच्यापेशी आता पांढरपेशा झाल्यात, आमचा जय-भीम तोंडातल्यातोंडात विरला, महामानवाचा स्थलांतर आम्ही बेडरूम मध्ये केले हे समाजचित्रण करतांना लेखणी जरासुद्धा डगमगली नाही व कुणाची भीडभाड सुद्धा ठेवली नाही. गुलामीची गळाभेट करू पाहणा-या कपाळ करंट्यांच्या मूर्खपणाला उद्देशून  व होत असलेल्या जिवंत यातना पाहून कवी अशा गद्दार प्रवृत्तींचा उपहासात्मकपणे विजयोत्सव साजरा करतो. 'बाबासाहेबांचा विजय असो ! पांढरपेशींचा  विजय असो !" बौद्धधम्माच्या विकृतीकरणाला हातभार लावणा-या व भगवान बुद्धाला अवतार रुपात पाहणा-यांना प्रकांडपंडितांनी वीस वर्षे अखंड अभ्यास केल्यानंतरही बौद्ध धम्मात विश्वाची निर्मिती?  विपश्यना?  ध्यानधारणा?  जातककथा? हे निर्हेतुक प्रश्न कवीला छळतात. विज्ञाननिष्ठ विचार देणा-या भगवान बुद्धांनी देखील या कृतीत स्वत:ला गुरफटून ठेवल्याचे  दिसत नाही.
सेझ-फेज, जागतिकीकरण  की नवं गजकरण?, काम्पुटर म्हणजे वावराचं मशीन काय भाऊ? हे समजून घेण्याकरिता कवी सर्वसामान्य माणसांच्या भोळ्या-भाबड्या  विचारविश्वात फिरून येतो.
 
            आयु. बळी खैरे यांनी रेखाटलेले मुखपृष्ठ करुणासागर तथागताच्या सर्वश्रेष्ठ मूल्यांचा शब्दाविना परिचय करून  देते. त्याचबरोबर 'तोच तू', 'अत्त दीप भवं', 'उभा देश धम्माला' , 'नाद ऐका' या कवितांचे प्रतिनिधित्त्व करते.अंधश्रद्धेवर घणाघाती प्रहार कारण-या कवितांबरोबरंच साहेबांच्या मर्जिकरिता सगळी मूल्य व तत्त्वे बाजूला ठेवत गोंडा घोळणा-या त्रासदायक प्रवृत्तींवरदेखील 'आपण आपलं जगावं मर्जी सांभाळून' या कवितेतून मर्माघाती तडाखे देणा-या कवींनी कवितांची दर्जेदार निवड व क्रम याचीदेखील दक्षता घेतली असून 'प्रज्ञा प्रबोध' प्रकाशन, सांगली यांनी शंभर नंबरी सोनं असलेल्या कवितासंग्रहाची किंमत शब्दात कशी वर्णावी? आकडयात सांगायचे तर फक्त शंभर रुपये. 'वेध' या कवितेचा आधार घेऊन मी म्हणेल राहू केतूचे देखील भविष्य अशुभ ठरवणारा हा नवा माणूस व्यवस्थेला चपराक देणारा असून या कवीजवळ प्रज्ञेचा सन्मार्ग व भीमक्रांतीचा बाणा, बुद्धाच्या अनुशासनाचे विज्ञान विचारांनी भरलेले सुंदर मन आहे.

            भोवताली असलेली अस्ताव्यस्त पडझड, गोंधळ अशा अनेक प्रश्नांच्या गर्दीच्या पुरामध्ये वाहत जात असलेल्या अनेक प्रवृत्तींना बाहेर काढण्याकरिता ही तडफदार काव्यनिर्मिती अनेकांवर हुकुमत गाजवणारी असून कणा असलेले हे साहित्य स्वयंघोषित बुद्धिमत्तेच्या ठेकेदारांना व आमच्या सारखे आम्हीच म्हणवणा-यांना नक्कीच लोळण घ्यायला लावील.
                                                                                                                                                                                                                                                            ÄÄÄÄÄÄÄÄÄ

कवितासंग्रहाचे नाव : 'ग्लासनोस्त'
कवी : पद्माकर तामगाडगे
प्रकाशन : प्रज्ञा प्रबोध प्रकाशन, सांगली
मूल्य : १०० रु
भ्रमणध्वनी : ९८६९५८१६४७




Comments

Popular posts from this blog

महिला सक्षमीकरण सुरु आहे. . .

|| सृजनवेध || महिला सक्षमीकरण सुरु आहे. . . - डॉ. पद्माकर तामगाडगे महिला सक्षमीकरणाची प्रक्रिया केव्हा पासून सुरु झाली ? याचा विचार केल्यास. लगेच ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन आठवतो आणि त्याच बरोबर आठवतो त्या घटनेमागील इतिहास. क्लारा जेटकिन या रूसी महिलेने सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला अधिवेशनाचा प्रस्ताव ठेवला होता . दर वर्षी ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जावा. तिने जगातील सर्व महिलांना आवाहन केले आणि पुरुष आणि महिलांमध्ये कुठल्याही प्रकारची दरी निर्माण होऊ नये. जर पुरुष झगडा करीत असेल तर महिलांनी शांत राहून सामंजस्याने विचार करून, शांतपणे लढावे. आणि मग १९११ पासून १९१५ पर्यंत सातत्याने ८ मार्च हा महिला दिवस म्हणून जगभर साजरा केला गेला. महिलांना संगठीत करण्यासाठी सेंट पीटर्सबर्ग शहरात ‘राबोनित्सा’ पत्रिका काढली गेली. आणि इथूनच महिलांवरील होणारे अन्याय अत्याचार, असमानता यांच्या विरोधात एक सक्षम नेतृत्व उभारल्या गेले. पहिल्या महायुद्धातील कालावधीत ओस्लो(नार्वे) मधील महिलांनी युद्धाचा निषेध दर्शविला, रशियन क्रांतीची सुरुवात ८ मार्च १९१...

तृतीयपंथीयांची अवहेलना का ?

तृतीयपंथीयांची अवहेलना का ? डॉ. पद्माकर तामगाडगे,             तृतीयपंथी, हिजडा, किन्नर, नपुंसक, षंढ असे नानाविध दुषणे लावून मानवी समाजातील एका संवेदनशील जीवाचे, माणसाचे माणूसपण हिरावून घेणे हे लाजिरवाणे नव्हे काय? जगात केवळ दोन लिंग अस्तित्वात आहे आणि ते म्हणजे स्त्री आणि पुरुष. तिसऱ्या लिंगाच्या माणसाने कुठे जायचे? त्याला जगण्याचा अधिकार नाही का ? वरील शब्द उच्चारताच हीन भाव उत्पन्न होतो. त्याचे कारण समाजाची मानसिकता हेच आहे. महाराष्ट्र शब्द कोशात दिलेल्या अर्थानुसार ‘हिजडा’ म्हणजे पुरुष वेषधारी नपुंसक, षंढ, निर्लज्ज- बीभत्स हावभाव, भाषण करणारा माणूस. किंवा निसत्व, दुबळा, पौरुष्यहीन माणूस, त्यातही पुष्टी जोडून काही हिजडे स्त्रीवेशात गावात दरसाल गरिबश्रीमान्तांकडून पैसे उकळतात त्यास वतनदार हिजडे म्हणतात. असे वर्णन येते. हे संपूर्ण हीनता व्यक्त करणारे व याच मानसिकतेतून तृतीयपंथीयांना हीन वर्तन करण्यास प्रवृत्त करणारी वागणूक हा समाज देतो. आज तृतीयापंथीयांच्या अशा बीभत्स स्थितीला समाजाची मानसिकताच जबाबदार आहे. कारण माणूस म...

अचल चेतनागृह : राजगृह -डॉ. पद्माकर तामगाडगे

अचल चेतनागृह : “राजगृह” “Education is not preparation for life: education is life itself.” John Dewey डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचा आयुष्यपट पहिला तरी जगातील प्रत्येक माणूस दिपून जातो असा लख्ख जीवन प्रवास जगातील अपवादात्मक विभूतीचाच असेल! किंबहुना फक्त डॉ. बाबासाहेबांचाच असेल... आयुष्यातील एकेक घटना आणि त्या घटना-प्रसंगांना येणारे अवघड वळण, आयुष्याच्या पावलोपावली येणारा नित्य संघर्ष. अस्पृश्यतेच्या सावटाखाली जगतांना येणाऱ्या अपमानाची झळ सोसत सर्वोच्च स्थानी पोहोचण्याचे परम ध्येय. उजेड मागत फिरणाऱ्या कफल्लक पिढ्यांना त्यांच्या झोळ्या लख्ख प्रकाशाने भरून काळोखाला प्रकाशमान करणारा हा महासूर्य. एकाच आयुष्यात अलौकिक म्हणावे, जादुई म्हणावे असे कार्य या महामानवाच्या हयातीत त्यांनी केले आहे. त्यांच्या उत्तुंग कार्याचा, व्यक्तिमत्वाचा वेध शब्दात पकडता येईल असा शब्दच कोणत्या भाषेत उपलब्ध नाही. अशाच एका पैलूचा या निमित्ताने धांडोळा या लेखाच्या निमित्ताने घेणार आहोत. महामानव डॉ. बाबासाहेबांचे एकूण आयुष्य पहिले तर प्रत्येक गोष्टीसाठी धडपड आहे. कोणतीच गोष्ट त्यांना सहजासहजी प्राप्त झाली नाह...